मराठी साहित्य आणि कलाविश्वात काही क्षणी अशी आनंदाची बातमी येते, जी केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसते, तर ती संपूर्ण सृजनशीलतेचा गौरव असते. सृजनाच्या या वाटेवर चालताना जेव्हा कष्टाचे चीज होते, तेव्हा तो आनंद अवघ्या रसिक समाजाचा होऊन जातो. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘युवक महोत्सवा’मध्ये विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.केदार काळवणे यांच्यामुळे मला परीक्षक म्हणून सहभागी होण्याची संधी लाभली. तो काळ म्हणजे चैतन्याचा उत्सवच होता. विठूरायाच्या त्या पावन नगरीत, जिथे भक्ती आणि कलेचा संगम होतो, तिथे परीक्षक म्हणून काम करताना कामाचा व्याप मोठा होता, पण त्याच व्यापातून विरंगुळ्याचे काही क्षण माझे मित्र प्रख्यात सिनेनाट्य लेखक-दिग्दर्शक डॉ. अनिलकुमार साळवे आणि अत्यंत संवेदनशील चित्रकार-लेखक राजू बाविस्कर यांच्या सहवासात व्यतीत झाले.
त्या सायंकाळी चंद्रभागेच्या काठी असलेल्या पंढरपूरच्या त्या भारलेल्या वातावरणात साहित्यापासून ते रंगभूमीपर्यंत अनेक विषयांवर आमच्या प्रदीर्घ गप्पा रंगल्या. संवादाच्या त्याच प्रवाही प्रवाहात त्यांच्या ‘काळ्या निळ्या रेषा’ या पुस्तकाबद्दलची चर्चा निघाली आणि ती माझ्या मनात खोलवर घर करून गेली. एखाद्या कलाकृतीचा जन्म कसा होतो आणि ती काळजाला कशी भिडते, याचा प्रत्यय त्या गप्पांतून येत होता. आज जेव्हा या पुस्तकाला ‘साहित्य अकादमी पुरस्कार २०२५’ जाहीर झाल्याची अधिकृत बातमी कानावर आली, तेव्हा एका खऱ्या, अस्सल आणि काळजाला भिडणाऱ्या माणुसकीच्या साहित्याचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान झाला, ही भावना मनात दाटून आली. हा सन्मान केवळ एका पुस्तकाचा नाही, तर त्यामागील प्रामाणिक अनुभूतीचा आहे.

उपेक्षितांचं जगणं आणि राजूभाऊंचा कुंचला :-
‘काळ्या निळ्या रेषा’ हे केवळ एक स्वकथन नाही, तर ते अनुभवांचे एक अथांग दालन आहे. यातील ‘कमली’ नावाचा जो भाग आहे, तो वाचताना मी अक्षरशः स्तब्ध झालो. राजूभाऊंनी ज्या कमालीच्या ताकदीने कमलीचे शब्दचित्र रेखाटले आहे, ते निव्वळ अफलातून आहे. आपल्या दोन्ही हातांनी तिने तयार केलेलं ते छोटंसं घर… ते केवळ मातीचं आणि काड्यांचं घर नव्हतं, तर ते तिच्या संपूर्ण अस्तित्वाचं, तिच्या संघर्षाचं आणि तिच्या स्वप्नांचं प्रतीक होतं. ते वाचताना वाचकाच्या मनात कायमचं रुतून बसतं. एखाद्या चित्रकाराने कॅनव्हासवर रंगांची उधळण करावी, तशी राजूभाऊंनी शब्दांची मांडणी केली आहे.
कमलीचं प्राक्तन आणि तिचं ते वेडसरपण, ज्यामध्ये ती स्वतःलाच गुरफटून घेते, याचे अंतरंग राजूभाऊंनी एक संवेदनशील कलावंत आणि एक माणूस म्हणून बेमालूमपणे उलगडून दाखवले आहे. कमली प्रेमाने वेडी झाली होती का? हा एकच प्रश्न वाचकाच्या मनात विचारांचे काहूर उठवून जातो. आपण ज्या समाजात वावरतो, तिथल्या जगण्याच्या धकाधकीत आपल्या सभोवताली अशा अनेक ‘कमली’ वावरत असतात, पण त्याकडे पाहण्याची, त्यांच्या वेदना समजून घेण्याची आणि त्यांची दखल घेण्याची दृष्टी केवळ एका डोळस चित्रकार-लेखकाकडेच असू शकते, हे राजूभाऊंनी सिद्ध केले आहे. त्यांच्या शब्दांतून कमलीचे दुःख केवळ दिसत नाही, तर ते अंगावर येते.
साहित्यातील माणुसकीची रूपेरी किनार:-
आयुष्याच्या वाटेवर जेव्हा संकटाचे आणि उपेक्षेचे ढग अधिकाधिक काळेकुट्ट होत असतात, तेव्हा राजू बाविस्कर आपल्या शब्दांच्या माध्यमातून माणुसकीच्या दर्शनाची एक ‘रूपेरी किनार’ दाखवतात. ही किनार खरोखरच दिलासादायक आहे. हे पुस्तक म्हणजे केवळ शब्दांची मांडणी किंवा भाषेचा केवळ अलंकारिक खेळ नाही, तर ते जळजळीत वास्तववादाचे एक टोक आहे. गावकुसाबाहेरच्या उपेक्षेचे जगणे, तिथली दाहकता, अगतिकता आणि त्या प्रतिकूल परिस्थितीतून उभा राहिलेला मानवी संघर्ष मांडण्याचे काम त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि उत्कटतेने केले आहे.
राजू बाविस्कर हे मुळात एक प्रतिभावंत चित्रकार आहेत. त्यामुळे त्यांच्या लेखणीला एक प्रकारची दृश्यात्मकता लाभली आहे. त्यांचे शब्द वाचताना जणू डोळ्यासमोर चित्रे उभी राहतात. जेव्हा ते शब्दांच्या माध्यमातून काही अनुभव सांगू पाहतात, तेव्हा त्यांच्या स्वकथनाला एक वेगळेच मूल्य प्राप्त होते. कष्टकऱ्यांच्या आणि वंचितांच्या जगण्याला कलेचा नवा आयाम देणारे हे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक आहे. माणुसकीच्या या प्रवासात रंगांना फुटलेली ही वाचा मराठी साहित्याला श्रीमंत करणारी आहे.
नाट्यशास्त्राच्या दृष्टीने ‘नाट्याशय’:-
एक रंगकर्मी म्हणून जेव्हा मी या पुस्तकाकडे पाहतो, तेव्हा मला यात एक प्रचंड मोठा आणि सखोल ‘नाट्याशय’ (Dramatic Element) जाणवतो. कमलीसारखी पात्रे, तिचे मानसिक द्वंद्व, तिच्यातील अबोल संवाद आणि गावकुसातील तो एकूण परिसर, हे सर्व रंगमंचावर उलगडून दाखविण्यासारखे आहे. वास्तववादी साहित्याचा हा वारसा जेव्हा नाट्यशास्त्राच्या आणि सादरीकरणाच्या अंगाने समोर येईल, तेव्हा ते मराठी रंगभूमीसाठी एक ऐतिहासिक योगदान ठरेल. यातील प्रसंग वाचताना डोळ्यासमोर एखाद्या प्रगल्भ नाटकाचे दृश्य उभे राहते. यातील पात्रांची हालचाल आणि संवादामध्ये एक आंतरिक नाट्य दडलेले आहे, जे प्रेक्षकांना खिळवून ठेवू शकते.
*राजहंसचा ऐतिहासिक ‘विजयी चौकार’*:-
या आनंदाच्या क्षणी ‘राजहंस प्रकाशन’ यांचेही विशेष अभिनंदन करणे कर्तव्य ठरते. राजहंसने यंदा साहित्यातील यशाचा जणू ‘चौकार’ लगावला आहे. एकाच प्रकाशनाने सलग चार वर्षे राष्ट्रीय स्तरावर यश मिळवणे ही ऐतिहासिक बाब आहे.
* २०२२: ‘मी संदर्भ पोखरतोय’ (प्रवीण बांदेकर)
* २०२३: ‘ब्राह्मोस’ (कृष्णात खोत)
* २०२४: ‘विंदांचे गद्यरूप’ (संपादक: रणधीर शिंदे)
* आणि आता २०२५: ‘काळ्या निळ्या रेषा’ (राजू बाविस्कर)
सलग चार वर्षे साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणे ही राजहंसच्या गुणवत्तेची आणि आशयसंपन्न साहित्यकृतींच्या निर्मितीच्या परंपरेची पावतीच आहे. ‘वाड्.मयीन मूल्य’ जपणाऱ्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेचाच या निमित्ताने सन्मान झाला आहे. मराठी साहित्याचा दर्जा उंचावण्यात राजहंसचा वाटा मोलाचा आहे.
प्रिय राजूभाऊ,
तुमच्या प्रतिभेचा कुंचला आणि शब्दांच्या रेषा जेव्हा एकाच रंगात न्हाऊन निघतात, तेव्हा ‘काळ्या निळ्या रेषा’ सारखी एक अजरामर कलाकृती निर्माण होते. डोळस साहित्याचा हा वारसा आपण पुढे नेत आहात, ही मराठी साहित्याच्या आणि विशेषतः उपेक्षितांच्या आवाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. एका चित्रकाराच्या रंग आणि रेषांत असलेल्या या माणुसकीचे जेव्हा दर्शन घडतं, तेव्हा त्याला सलाम केल्याखेरीज राहता येत नाही.मंगला गोडबोले, राजन गवस आणि नागोराव तम्माजी उत्तरकर यांसारख्या दिग्गज निवड समितीने या कलाकृतीवर मोहोर उमटवली आहे. साहित्यातील हा अत्यंत मानाचा प्रवास असाच बहरत राहो, हीच सदिच्छा!
आपला हा साहित्यिक प्रवास असाच उत्तरोत्तर बहरत राहो आणि तुमच्या लेखणीतून असेच वास्तववादी साहित्य जन्माला येत राहो, हीच सम्यक मंगलकामना!
स्नेहांकित,
*डॉ. सिद्धार्थ तायडे*
(रंगकर्मी) संवाद:9822836675