अहिल्यानगर | समीर मण्यार | नगरी नगरी :
काचबिंदू या ‘निःशब्द अंधत्वा’विरोधात जनजागृती निर्माण करण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा ऑपटॅनिक अकॅडमीच्या वतीने सावेडी परिसरात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. काचबिंदू निर्मूलन सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमात शहरातील नेत्रतज्ञांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नागरिकांना वेळेवर नेत्र तपासणीचे महत्त्व पटवून दिले.
रॅलीची सुरुवात प्रोफेसर कॉलनी चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली. जिल्हाध्यक्ष डॉ. रावसाहेब बोरुडे आणि सचिव डॉ. राजीव चिटगोपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली आयोजित करण्यात आली होती.
यावेळी डॉ. प्रकाश रसाळ, डॉ. अशोक महाडिक, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. सुधीर इंगळे, डॉ. प्रमोद कापसे, डॉ. प्रसन्न खणकर, डॉ. दिलीप फलके, डॉ. अनिल सिंग, डॉ. रोहित थोरात, डॉ. शैलेंद्र पोतनीस, डॉ. शिल्पा खंडेलवाल यांसह अनेक नेत्रतज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान नागरिकांना काचबिंदूविषयी माहिती देत त्याच्या लक्षणांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले. काचबिंदू हा सुरुवातीला कोणतीही ठळक लक्षणे न दाखवता दृष्टीवर परिणाम करतो, त्यामुळे वेळोवेळी तपासणी करणे अत्यावश्यक असल्याचे तज्ञांनी सांगितले.
दरम्यान, राज्यभर २२ मार्चपासून सात दिवस ‘काचबिंदू सप्ताह’ साजरा केला जात असून, त्याअंतर्गत विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. या कालावधीत मोफत नेत्र तपासणी शिबिरे, मार्गदर्शन सत्रे आणि उपचार पद्धतींबाबत माहिती देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
⚠️ नागरिकांसाठी आवाहन
👉 नियमित नेत्र तपासणी करा
👉 काचबिंदूची लक्षणे दुर्लक्षित करू नका
सावेडीत आयोजित या रॅलीमुळे काचबिंदूसारख्या गंभीर आजाराबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढण्यास मोठी मदत होणार असून, वेळेत निदान झाल्यास अंधत्व टाळणे शक्य असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.