क्रिकेट । ६.०३ । नगरी नगरी :
( Final ) टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताने दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला असला, तरी उपांत्य फेरीतील एका निर्णयावरून क्रिकेटविश्वात मोठी चर्चा रंगली आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी घेतलेल्या एका गोलंदाजी निर्णयावर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत भारताला थेट इशाराच दिला आहे.
( Final ) अटीतटीच्या सामन्यात भारताचा थरारक विजय
५ मार्च रोजी मुंबईत खेळल्या गेलेल्या या उपांत्य सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत तब्बल २५४ धावांचा डोंगराएवढा स्कोर उभारला. इंग्लंडसमोर विजयासाठी मोठे लक्ष्य होते आणि त्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. शेवटच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी ३० धावांची गरज होती.
या निर्णायक क्षणी कर्णधार सूर्यकुमार यादवने चेंडू शिवम दुबे यांच्या हातात दिला. त्या षटकात इंग्लंडच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत २२ धावा काढल्या. मात्र भारताने अखेरीस सामना ७ धावांनी जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला.

( Final ) मायकल वॉनची सडकून टीका
या निर्णयावर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. क्रिकेट विश्लेषण करताना त्यांनी सांगितले की, भारत जिंकला असला तरी सूर्यकुमार यादवचा हा निर्णय धोकादायक होता.
वॉन म्हणाले, “भारताने सामना जिंकला असला तरी सूर्याचा हा निर्णय मला अजिबात पटलेला नाही. अक्षर पटेलसारखा अनुभवी आणि अचूक गोलंदाज उपलब्ध असताना शिवम दुबेला गोलंदाजी देणे ही मोठी जोखीम होती.”
त्यांनी पुढे आकडेवारी सांगत दुबेच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वॉनच्या मते, दुबेने आपल्या मागील तीन षटकांत ६८ धावा दिल्या आहेत, जे अत्यंत चिंताजनक आहे.
( Final ) अंतिम सामन्यापूर्वी चिंता वाढली
वॉनने स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, अंतिम सामन्यात अशाच प्रकारची गोलंदाजी झाली तर भारत अडचणीत येऊ शकतो. त्यांच्या मते, मोठ्या सामन्यांमध्ये रणनीती गुंतागुंतीची करण्याऐवजी सर्वोत्तम आणि विश्वासार्ह गोलंदाजांवर भरोसा ठेवणे आवश्यक असते. पूर्ण स्पर्धेत शिवम दुबेचा इकॉनॉमी रेट १४ च्या वर राहिला असल्यामुळे ही बाब भारतासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
( Final ) रणनीतीमागील शक्यता
मैदानावरील परिस्थितीनुसार समोर डावखुरा फलंदाज असल्याने सूर्यकुमार यादवने डावखुरा फिरकीपटू असलेल्या अक्षर पटेलला गोलंदाजी दिली नसावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र मायकल वॉनने हा तर्क फेटाळून लावत मोठ्या सामन्यांत सरळ आणि प्रभावी निर्णय घ्यावेत, असे मत मांडले.
( Final ) अंतिम सामन्याकडे सर्वांचे लक्ष
भारताने अंतिम फेरी गाठली असली तरी या निर्णयामुळे आता चर्चेला उधाण आले आहे. अंतिम सामन्यात न्युझिलंड संघाविरुद्ध टीम इंडिया कोणती रणनीती अवलंबते आणि गोलंदाजीतील अशा चुका टाळते का, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.