सोनई ।१७.०२ । संजय वैरागर । नगरी नगरी :
नेवासा तालुक्यातील महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सोनई ग्रामपंचायतीच्या नळ पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाईपलाईनमधील लिकेजमुळे रस्त्यावर सतत पाण्याचा प्रवाह सुरू असून अनेक भागांत रस्ते जलमय झाले आहेत. परिणामी चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत.
या पाईपलाईन गळतीमुळे काही ठिकाणी गाड्या चिखलात घसरून अपघातही झाले असून अनेकांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास अनेक वेळा हा प्रकार आणून देण्यात आला आहे. मात्र आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.
दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असून भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने वेळीच खबरदारी घ्यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे पाणी आंदोलन छेडण्यात येईल. असा इशार संविधान नायक ब्ल्यू फायटर्स या सामाजिक संघटनेमार्फत देण्यात आला आहे .
काही ठिकाणी नाल्यातील मलमिश्रित पाणी रस्त्यावर साचत असल्याने आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर काही वेळातच लिकेजमधून पाणी बाहेर पडून संपूर्ण रस्ता पाण्याखाली जातो. त्यामुळे तातडीने दुरुस्ती करून पाणी वाचवावे, अशी मागणी होत आहे.
एकीकडे काही भागांत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई जाणवत असताना, दुसरीकडे नियोजनाच्या अभावामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र आहे. शासनाकडून भविष्यात पाणी प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो, असा इशारा वेळोवेळी दिला जात असतानाही सोनई ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.