राहुरी (प्रतिनिधी)।१३.०३। नगरी नगरी :
राहुरी शहराचे ग्रामदैवत असलेल्या खंडोबा महाराजांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर नगर–मनमाड राज्य महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्यासाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी शुक्रवारी पहाटेच राहुरीत भेट देत कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित ठेकेदाराला कामाचा वेग वाढवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
सकाळी सात वाजण्याच्या सुमारास डॉ. विखे पाटील यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कामाची पाहणी करत प्रगतीचा आढावा घेतला. दरम्यान, शहरातील वाहतूक व्यवस्था यात्रेदरम्यान सुरळीत राहावी, यासाठी अपूर्ण काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राहुरीत दरवर्षी होणाऱ्या खंडोबा यात्रेसाठी हजारो भाविकांची गर्दी होत असते. यात्रेच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढत असल्याने अपूर्ण रस्त्यांमुळे नागरिक व भाविकांना अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी यात्रेपूर्वीच काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
खंडोबा महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर डॉ. विखे पाटील थेट रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी पोहोचले आणि ठेकेदाराला कामाचा वेग वाढवण्यास सांगितले. यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर भाविकांची व वाहनांची वर्दळ असते, त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नगर–मनमाड राज्य महामार्गाचे अपूर्ण काम प्राधान्याने पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
नगर–मनमाड राज्य महामार्गाचा निधी व कामकाज अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे वादात अडकले होते. मात्र आता या रस्त्याच्या कामाकडे पुन्हा लक्ष देत ते लवकर पूर्ण व्हावे, यासाठी डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.
या पाहणीवेळी दादा पाटील सोनवणे, नगरसेवक अरुण साळवे, राजेंद्र उंडे, अमोल काशीद, नंदकुमार डोळस, सचिन मेहत्रे, अजित डावखर, नरेंद्र शेटे, सुजय काळे, युवराज गाडे, दिनेश उंडे, संतोष बर्डे, जितू बर्डे, शांताराम शेटे, सुरेश भुजाडी, कारभारी डौले, सचिन भोंगळ, राजेंद्र वराळे, ठेकेदार महेश गायकवाड व संपर्क अधिकारी मनोज गव्हाणे आदी उपस्थित होते.