नेवासा | किरण डहाळे | नगरी नगरी :
समाजात रूढ झालेल्या मृत्यूशी संबंधित अंधश्रद्धा, भीती आणि कर्मकांडांना छेद देत सौंदाळा गावचे लोकनियुक्त सरपंच शरद बाबुराव आरगडे यांनी एक अनोखा आणि विचारप्रवर्तक उपक्रम हाती घेतला आहे. ‘जिवंतपणी दहावा’ या संकल्पनेतून त्यांनी समाजासमोर विज्ञाननिष्ठ विचार, माणुसकी आणि सामाजिक प्रबोधनाचा नवा आदर्श उभा केला आहे.
“अंधश्रद्धा अज्ञानातून भीती निर्माण करते, तर विज्ञान ज्ञानाच्या प्रकाशातून सत्य समोर आणते,” या विचारातून प्रेरित होत आरगडे यांनी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. मृत्यूनंतर होणाऱ्या विधींमधील भीतीदायक समजुतींपेक्षा जिवंत असताना माणसाचा सन्मान करणे अधिक महत्त्वाचे असल्याचा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे.
मृत्यूपेक्षा जीवनाचा उत्सव मोठा
भारतीय समाजात मृत्यूनंतरचे तेरा दिवस आणि त्यातील ‘दहावा’ हा विधी अत्यंत भावनिक आणि पारंपरिक मानला जातो. विशेषतः “कावळा अन्नाला शिवला तरच मृतात्म्यास शांती मिळते” या समजुतीला समाजात खोलवर स्थान आहे. मात्र या अंधश्रद्धेला छेद देत आरगडे यांनी निसर्गाचे नियम आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यांच्या मते, मृत्यूनंतर कावळ्याची वाट पाहण्यापेक्षा जिवंत असताना आपल्या माणसांच्या ताटात प्रेमाचा घास वाढणे अधिक महत्त्वाचे आहे. “मृत्यूनंतरच्या कर्मकांडांपेक्षा जिवंतपणीचा सन्मान हाच खरा धर्म आहे,” असे ते ठामपणे सांगतात.
अंधश्रद्धेविरोधातील सामाजिक संदेश
हा उपक्रम केवळ परंपरांना विरोध करण्यासाठी नसून समाजाला विचार करायला भाग पाडणारा आहे.
आरगडे म्हणाले,
“आपण मृत्यूनंतर श्राद्ध करतो, पण जिवंत असताना आई-वडिलांच्या डोळ्यातील अश्रू पुसतो का? मृत्यूनंतर दानधर्म करतो, पण जिवंतपणी गरजूंना मदत करतो का? हाच प्रश्न समाजाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.”
त्यांच्या मते, अंधश्रद्धा ही अज्ञानातून निर्माण होते आणि भीतीवर जगणारे काही भोंदू लोक त्याचा गैरफायदा घेतात. त्यामुळे विज्ञानाचा स्वीकार करून समाजाने या मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडणे आवश्यक आहे.
देहदानातून मानवतेचा संदेश
या सामाजिक संदेशाला अधिक व्यापक रूप देत शरद आरगडे यांनी स्वतःच्या मृत्यूनंतर देह मेडिकल कॉलेजला दान करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. यापूर्वी त्यांच्या आजोबा भानुदास मारुती आरगडे यांचेही देहदान करण्यात आले होते.
याबाबत बोलताना त्यांनी सांगितले,
“देह जळाला तर राख होईल, पुरला तर माती होईल; पण दान केला तर कुणाचे तरी प्राण वाचवण्याचे साधन होईल.”
त्यांच्या या निर्णयामुळे गावात आणि परिसरात सामाजिक जाणीवेची नवी चर्चा सुरू झाली असून अनेकांनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.
विचारांची नवी लाट
सौंदाळा गावातून सुरू झालेला हा उपक्रम केवळ एका व्यक्तीचा निर्णय नसून अंधश्रद्धेविरोधात उभी राहणारी विचारांची नवी चळवळ ठरत आहे.
“माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे,” हा संदेश देत ‘जिवंतपणी दहावा’ ही संकल्पना आता समाजमनाला नवा विचार देणारी ठरत आहे.
समाजात विज्ञाननिष्ठता, संवेदनशीलता आणि मानवतेची बीजे रुजविणाऱ्या या उपक्रमामुळे सौंदाळा गाव राज्यभर चर्चेचा विषय बनले आहे.