(Ind vs Pak) अटी-तटीचा होईल असे वाटणारा भारत- पाकिस्तान सामना अगदीच एकतर्फी झाला. प्रथम फलंदाजी करून १७६ धावांचे लक्ष्य ठेवणाऱ्या भारतीय संघाने पाकिस्तानला ११४ धावांत गुंडाळले आणि भारतीय क्रीडा रसिकांना खुश केले.
(Ind vs Pak) नाणफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारणाऱ्या पाकिस्तान संघाने स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या भारतीय संघाला १७५ धावात रोखले. भारतीय फलंदाजीमध्ये ईशान किशन याने १९२ च्या सरासरीने ४० चेंडूत ७७ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर मात्र षटकामागे १० धावांची सरासरी राखणाऱ्या भारताची धावसंख्या सरासरी ८ धावा प्रति षटक अशी झाली. तारिक उमर या फिरकी गोलंदाजाला केवळ एक बळी मिळवता आला, मात्र त्याने त्याचे चार षटकांमध्ये केवळ २४ धावा देऊन भारतीय फलंदाजांना वेसण घातली. सईम अयुब या फिरकीपटूने २५ धावांत तीन बळी घेतले. त्याची हॅट्रिकची संधी मात्र हुकली.
(Ind vs Pak) तुलनेने कमी धावसंख्या झाल्यामुळे सामना चुरशीचा होईल अशी शक्यता होती. मात्र १७६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरणाऱ्या पाकिस्तान संघाची भारतीय गोलंदाजांनी ३ बाद १३ अशी अवस्था करून सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकविला . त्यांच्या सहा फलंदाजांना दोन आकडी संख्याही गाठता आली नाही. यष्टिरक्षक फलंदाज उस्मान खानने थोडाफार प्रतिकार करत ३४ चेंडूत ४४ धावा केल्या हीच काय पाकिस्तानी खेळातील समाधानाची बाब. १५ व्या षटकात पाकिस्तान संघाच्या ८ गडी बाद ९७ धावा झाल्या तेव्हा सामन्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले होते .
(Ind vs Pak) भारतीय गोलंदाजांमध्ये जसप्रित बुमराह याने १७ धावा देत २ बळी घेतले. हार्दिक पंडयाने १६ धावात २ बळी घेतले. कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वरूण चक्रवर्ती यांनी अनुक्रमे १, २ आणि २ बळी घेतले. डावातले १७ वे षटक रिंकू सिंग याला देऊन सूर्यकुमार यादवने क्रीडाप्रेमींना धक्का दिला. त्याच्या पहिल्या दोन चेंडूवर दोन चौकार लगावले गेले. मात्र तो पर्यंत सामना पाकिस्तानच्या हातातून निसटला होता.
१८ व्या षटकात पाकिस्तानी संघाच्या सर्वबाद ११४ धावा झाल्या आणि ६१ धावांनी भारतीय संघाने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. या विजयामुळे भारतीय संघाने सुपर ८ फेरीमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे .
नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.