‘आकाशवाणी @ ९०’ उपक्रमा अंतर्गत निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अक्षता वडवणीकर प्रथम

अहिल्यानगर । प्रतिनिधी । नगरी नगरी : देशातील सर्वात विश्वासार्ह आणि जनमानसाशी घट्ट नाळ जुळलेले प्रसारमाध्यम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या All…
1 Min Read 0 140

अहिल्यानगर । प्रतिनिधी । नगरी नगरी :

देशातील सर्वात विश्वासार्ह आणि जनमानसाशी घट्ट नाळ जुळलेले प्रसारमाध्यम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या All India Radio च्या स्थापनेला यंदा नव्वद वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक टप्प्याच्या स्मरणार्थ देशभरात ‘आकाशवाणी @ ९०’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आणि Yuvaan यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली निबंध लेखन स्पर्धा रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

अहिल्यानगर येथील जैन बोर्डिंगमधील युवान वसतिगृहात आयोजित या स्पर्धेला शहरातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बदलत्या सामाजिक, शैक्षणिक आणि तंत्रज्ञानप्रधान वातावरणात युवकांचे विचार जाणून घेण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी केवळ सहभागच नोंदवला नाही, तर विविध विषयांवर परिपक्व आणि अभ्यासपूर्ण विचार लेखनाच्या माध्यमातून मांडले.

स्पर्धेसाठी निवडण्यात आलेले विषय हे युवकांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडित आणि आजच्या काळाशी सुसंगत असे होते. ‘आकाशवाणीचे बदलते स्वरूप’, ‘राष्ट्र उभारणीत युवकांची भूमिका’, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि युवकांसमोरील आव्हाने’ तसेच ‘समाजमाध्यमे आणि युवक’ या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपापले विचार प्रभावी शब्दांत व्यक्त केले. काही विद्यार्थ्यांनी आकाशवाणीच्या विश्वासार्हतेवर भाष्य केले, तर काहींनी डिजिटल युगात पारंपरिक माध्यमांचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुदाम बटुळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करत आकाशवाणीच्या कार्याचा मागोवा घेतला. त्यांनी ‘आकाशवाणी @ ९०’ या उपक्रमामागील उद्दिष्ट स्पष्ट करताना, युवकांनी पारंपरिक माध्यमांशी जोडले जाणे किती आवश्यक आहे, यावर भर दिला. माहिती, संस्कृती, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यामध्ये आकाशवाणीची भूमिका आजही तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

यानंतर युवानचे संस्थापक संदीप कुसळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या वेगवान डिजिटल युगात युवकांना योग्य दिशेने विचार करण्यासाठी अशा स्पर्धा अत्यंत आवश्यक आहेत. आकाशवाणीसारख्या माध्यमांच्या सहकार्याने युवकांमध्ये अभिव्यक्ती, चिंतन आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे कार्य अधिक प्रभावीपणे करता येते, असे त्यांनी सांगितले.

स्पर्धेतील निबंधांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांनी केले. विचारांची मांडणी, भाषाशैली, विषयाची समज आणि नावीन्यपूर्ण दृष्टिकोन या निकषांवर उत्कृष्ट निबंधांची निवड करण्यात आली. त्यामध्ये अक्षता दत्तात्रय वडवणीकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. आरती ज्ञानदेव आरगडे हिने द्वितीय क्रमांक, तर सूरज सुरेश चव्हाण याने तृतीय क्रमांक मिळविला. तसेच गौरी रविंद्र लहामगे आणि मंगेश दत्तात्रय गुंजाळ यांना उत्तेजनार्थ पारितोषिकांनी गौरविण्यात आले.

स्पर्धेनंतर सहभागी विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. आकाशवाणीशी अधिक जवळीक निर्माण झाल्याची भावना व्यक्त करत अशा बौद्धिक आणि सर्जनशील उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. युवकांच्या विचारांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास समाजपरिवर्तनाची दिशा निश्चित होऊ शकते, असा आशावादही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अतुल सातपुते, वृषाली घनवट, मीना जाधव, श्रेयस लहामगे आणि चेतन औटे यांनी विशेष परिश्रम घेतले. युवकांच्या विचारांना चालना देणारा हा उपक्रम आकाशवाणीच्या सामाजिक बांधिलकीचे आणखी एक प्रभावी उदाहरण ठरल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media