राजेंद्र देवढे | ९.३ | नगरी नगरी
जिल्ह्यात एलपीजी गॅसच्या पुरवठ्याबाबत नागरिकांनी कोणतीही चिंता करण्याचे कारण नसून जिल्ह्यात सध्या गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली. काही ठिकाणी गॅस टंचाईबाबत अफवा पसरवल्या जात असल्याचे निदर्शनास येत असून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील एलपीजी गॅस पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यातील गॅस साठा, वितरण व्यवस्था आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश
जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, एलपीजी गॅसच्या गोदामांची विशेष पथकाद्वारे अचानक तपासणी करण्यात यावी. काहीजण कृत्रिम टंचाई निर्माण करून नागरिकांना अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करत असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच गॅस वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखून नागरिकांना वेळेत सेवा मिळेल यासाठी गॅस एजन्सींनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे.
अधिकृत पुरवठादारांकडूनच गॅस घ्यावा
बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बढे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी एम. के. चौधरी, बीपीसीएल कंपनीचे राजकुमार मिश्रा तसेच संबंधित गॅस कंपन्यांचे प्रतिनिधी आणि गॅस वितरक उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, ग्राहकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी आणि गॅस सिलिंडरची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करावी. तसेच गॅसचे वितरण नियमानुसार होत आहे याची खात्री करून अधिकृत गॅस एजन्सीकडूनच सिलिंडर घ्यावा.
तक्रारींसाठी टोल-फ्री क्रमांक उपलब्ध
गॅस वितरणासंदर्भात काही अडचणी किंवा तक्रारी असल्यास नागरिकांनी खालील टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रशासनाने सांगितले आहे :
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन : १८००२२४३४४
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड : १८००-२३३३-५५५
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड : १८००-२३३३-५५५
तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष – १०७७ या क्रमांकावरही संपर्क साधता येईल.
प्रशासनाचे सतत लक्ष
जिल्ह्यातील गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. गॅस एजन्सींनी वेळेत व नियमानुसार सिलिंडरचा पुरवठा करावा आणि ग्राहकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी दिल्या.