अहिल्यानगर | प्रतिनिधी | नगरी नगरी :
समाजातील वाढत्या दुराव्याला संवादाच्या माध्यमातून कमी करून समरसतेचा मार्ग खुला करण्याचा प्रभावी संदेश ‘नब्ज़’ ईद विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यातून देण्यात आला. शहरातील रहेमत सुलतान हॉल येथे सकल भारतीय समाजाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात संपादिका मिनाज लाटकर यांनी संवाद आणि सकारात्मकतेचे महत्त्व अधोरेखित केले.
मिनाज लाटकर आपल्या भाषणात म्हणाल्या की, आज समाज धर्म, द्वेष आणि गैरसमजांच्या वातावरणात अडकला असून, त्यामागे संवादाचा अभाव हे प्रमुख कारण आहे. बहुसंख्यांक आणि मुस्लिम समाज एकमेकांच्या जवळ राहूनही त्यांच्या भाषा, संस्कृती, खानपान आणि जीवनशैलीबद्दल अनभिज्ञ आहेत. ” नब्ज़ ” च्या माध्यमातून या दोन घटकांमध्ये संवादाची बीजं रुजवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे दुराव्याच्या भिंती कोसळून आपुलकीचा पूल उभा राहील” असे त्यांनी स्पष्ट केले.
🟩 राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद
‘नब्ज़’ ईद विशेषांकाचे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी स्वयंस्फूर्तीने प्रकाशन सोहळे आयोजित करण्यात आले असून, हीच त्याच्या यशाची खरी पावती असल्याचे लाटकर यांनी नमूद केले. अहमदनगर शहरातही मोठ्या उत्साहात झालेला हा सोहळा ‘नब्ज़’ टीमसाठी सकारात्मक आणि प्रेरणादायी ठरला.
🟦 मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
या विशेषांकाचे प्रकाशन सोनाली देवढे-शिंदे, संध्या मेढे, मरयम सय्यद आणि मिनाज लाटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युनूसभाई तांबटकर आणि आनंद शितोळे यांच्या हस्ते मिनाज लाटकर यांचा सत्कार करण्यात आला.
🟧 ‘नब्ज़’चा प्रवास आणि भविष्यातील गरज
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.एम. जोशी फौंडेशनचे अध्यक्ष साथी सुभाष वारे यांनी केले. त्यांनी ‘नब्ज़’ आणि मिनाज लाटकर यांचा प्रेरणादायी प्रवास उलगडून सांगत, आजच्या काळात अशा उपक्रमांची अत्यंत गरज असल्याचे अधोरेखित केले. यावेळी सोनाली देवढे-शिंदे यांनी ‘नब्ज़’ प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.
🟪 लेखकांचे विचार मांडणी
‘नब्ज़’चे लेखक समीर गायकवाड यांनी ‘प्रतिगामी ते पुरोगामी’ या आपल्या प्रवासाबद्दल सांगताना, समाजात बदल घडवण्यासाठी सजग आणि धाडसी भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
‘नब्ज़’ ईद विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्याने संवाद, समरसता आणि सामाजिक ऐक्याचा प्रभावी संदेश दिला. समाजातील भिंती कोसळवून परस्पर समजुतीचा पूल उभारण्याची गरज अधोरेखित करत हा उपक्रम सामाजिक एकात्मतेसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.
🟫 मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास अशोक सब्बन, प्रजापती, असिफखान दुलेखान, आबिद खान, इंजि. अभिजित वाघ, डॉ. प्रशांत शिंदे, प्रा. मुदस्सर सय्यद, प्रा. बापू चंदनशिवे, प्रा. अतुल चौरपगार, तुषार सोनवणे, पंकज गुंदेचा, ॲड. विद्या शिंदे-जाधव, रुतुजा शिंदे, फिरोज शेख, डॉ. परवेज अशरफी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ. प्रा. डॉ. महेबुब सय्यद यांनी केले, तर आभार प्रदर्शन रयत समाचारचे संपादक भैरवनाथ वाकळे यांनी मानले.