अहिल्यानगर । प्रतिनिधी । नगरी नगरी –
शहराच्या ऐतिहासिक जुन्या महापालिका परिसरात तब्बल २० वर्षांनंतर ध्वजारोहणाचा सोहळा पार पडत महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरे करण्यात आले. या विशेष प्रसंगी उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकावण्यात आला, ज्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमादरम्यान उपमहापौर जाधव यांच्या हस्ते स्व-जनगणना उपक्रमाचा शुभारंभही करण्यात आला. या वेळी उपायुक्त शहनवाज तडवी, प्रभाग अधिकारी अजीम शेख, जनगणना अधिकारी राकेश कोतकर, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, तसेच नितीन इंगळे, सुबोध देशमुख, विकास गीते यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमहापौर धनंजय जाधव म्हणाले, “जुन्या महापालिकेत २० वर्षांनंतर ध्वजारोहण होत असल्याचा मला विशेष आनंद आहे. ही ऐतिहासिक वास्तू जपणे ही आपली जबाबदारी आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा.” त्यांनी कामगारांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करत देशाच्या प्रगतीत त्यांच्या भूमिकेची प्रशंसा केली.
स्व-जनगणनेबाबत माहिती देताना ते म्हणाले की, “१ मे ते १५ मे दरम्यान नागरिकांनी मोबाईल पोर्टलद्वारे स्वतःची नोंदणी करावी. त्यानंतर १६ मे ते १४ जून या कालावधीत घरोघरी जाऊन जनगणना केली जाणार आहे. ही प्रक्रिया देशाच्या विकासाची दिशा ठरविणारी ठरणार आहे.”
या कार्यक्रमामुळे नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक बळकट झाली असून स्व-जनगणना उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.