अहिल्यानगर | प्रतिनिधी । नगरी नगरी :
अहिल्यानगर शहराच्या इतिहासाची साक्ष देणारी सुमारे ४०० वर्षे जुनी माळीवाडा वेस पाडण्याचा काही समाजकंटकांकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप करत माळीवाडा वेस बचाव समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे.
समितीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, माळीवाडा वेस ही अहिल्यानगरच्या इतिहासाची आणि सांस्कृतिक वारशाची महत्त्वपूर्ण ओळख आहे. शहराच्या जडणघडणीचा साक्षीदार असलेली ही वेस एकेकाळी शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखली जात होती. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूचे जतन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे समितीने अधोरेखित केले आहे.

निवेदनानुसार, पुरातत्त्व विभागाने १९७६ तसेच २०२२ साली या वेशीचे संरक्षण करण्याचे निर्देश दिले होते. तसेच या ऐतिहासिक रचनेला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवू नये, असे आदेश तत्कालीन न्यायपालिकेनेही दिले होते. इतिहासातील नोंदीनुसार माळीवाडा वेस सुमारे १६३२ साली बांधण्यात आली असल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे.
मात्र, काही समाजकंटकांकडून ही वेस पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप समितीने केला असून, या ऐतिहासिक वास्तूला तातडीने पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

दरम्यान, यापूर्वीही माळीवाडा वेस पाडण्याच्या प्रस्तावाला नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला होता. ११ डिसेंबर २०२४ रोजी नागरिकांनी ही मागणी महापालिका आयुक्तांकडे मांडली होती. त्यानंतर नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन १३ डिसेंबर २०२४ रोजी आयुक्तांनी जाहीर पत्रकाद्वारे वेस निष्कासित करण्याचा निर्णय रद्द केला होता.
तरीदेखील काही व्यक्तींनी वेस पाडण्याबाबत वक्तव्ये केल्याने अशा व्यक्तींवर भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ मधील कलम ३५२, ३५३ आणि १६ अंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी समितीने केली आहे.
या निवेदनावेळी संभाजी कदम, अनिल शिंदे, दत्तात्रय कावरे, अनिल लोखंडे, परेश लोखंडे, भैरवनाथ वाकळे, भूषण देशमुख, नितीन भुतारे, पंकज मेहेर तसेच इतिहासप्रेमी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.